प्रसिद्ध हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी महाराष्ट्रातील पुढील आठवड्याच्या हवामानाचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, आजपासून (ता. २३ ते २७) पर्यंत राज्यात हवेचा दाब अधिक राहील, परिणामी थंडीचा जोर वाढणार आहे. मात्र, आठवड्याच्या मध्यावर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असल्याने हवामान बदलून ढगाळ स्थिती निर्माण होणार आहे.
हवेचा दाब आणि थंडीची स्थिती
आजपासून (ता. २३ ते २७ नोव्हेंबर) पर्यंत महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. किमान व कमाल तापमानात घसरण होताच हवेच्या दाबात वाढ होते, ज्यामुळे या दिवसांमध्ये थंडीचे प्रमाण अधिक राहील. किमान व कमाल तापमानात घसरण झाल्यामुळे काही भागात, विशेषतः उत्तरेकडील भागात, थंडीची लाट जाणवेल. उद्या (ता. २४), मंगळवार (ता. २५) आणि शुक्रवार (ता. २८) या दिवशी थंडीचे प्राबल्य थोडे कमी होऊन सौम्य थंडी जाणवेल. प्रामुख्याने महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असे हवामान राहील.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती
बुधवारी (ता. २६) बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन लहान चक्रिय वादळाची निर्मिती होईल. चक्राकार वाऱ्यामुळे भारताच्या दक्षिण भागात बाष्पयुक्त वारे शिरकाव करतील. त्यामुळे राज्यात हवामान ढगाळ राहील. ढगाळ हवामानामुळे एकूण तापमानावर परिणाम होऊन रात्रीच्या तापमानात थोडीफार वाढ होईल. हे चक्रिय वादळ गुरुवारी (ता. २७) आंध्र किनारपट्टीजवळ असेल आणि सोमवारला (ता. १ डिसेंबर) झारखंड आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर जाऊन धडकेल. या काळात महाराष्ट्रासह दक्षिण भारतात हवामान ढगाळ राहील. ज्या भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र असेल, तेथे अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होईल, असा अंदाज साबळे यांनी वर्तवला आहे.
तापमान वाढ आणि पिकांवर होणारे परिणाम
या काळात गारपिटीची शक्यता कमी राहील, कारण बंगालच्या उपसागरातून येणारे वारे अतिथंड नसतील, असे साबळे यांनी स्पष्ट केले आहे. हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले असल्याने बाष्प निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशांत महासागराच्या पाण्यातील कमी तापमानामुळे तिकडचे बाष्पयुक्त वारे इकडे येऊ शकत नाहीत, परिणामी बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची निर्मिती होऊन सर्व बाष्प दक्षिण भारताचे दिशेने येत राहील. या वादळाची तीव्रता आठवडाअखेर कमी झाल्यानंतर पुन्हा थंडीत वाढ होईल. हवामान ढगाळ राहण्यामुळे पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भावासाठी पोषक स्थिती राहील, अशी महत्त्वाची माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.