हरभरा पेरणीसाठी १० डिसेंबरपर्यंत वेळ; उशिरा पेरणीत उत्पन्नासाठी घ्या ‘ही’ काळजी
राज्यातील हवामानाबद्दल बोलायचं झाल्यास, आज म्हणजेच २६ नोव्हेंबरपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर, २७ नोव्हेंबर २०२५ पासून राज्यात थंडीची तीव्र लाट येण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला आहे. ही थंडी उत्तर भारतातून सुरू होऊन हळूहळू संपूर्ण राज्यात पसरेल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी हवामानातील या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार शेतीची कामे त्वरित आटपून घ्यावीत.
हरभरा पेरणीसाठी १० डिसेंबरची अंतिम मुदत
ज्या शेतकरी बांधवांना कापूस काढणीमुळे हरभरा पेरणीसाठी उशीर झाला असेल किंवा ज्यांनी अद्याप पेरणी केली नसेल, त्यांनी काळजी करू नये. हरभरा पेरणीसाठी अजूनही १० डिसेंबर २०२५ पर्यंतची वेळ उपलब्ध आहे. १० डिसेंबरपर्यंत पेरणी केली तरी उत्पन्नावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र, उशिरा पेरणी केल्यास शेतकऱ्यांनी पिकाला पाण्याची व्यवस्था करावी लागेल. पेरणीनंतर एक आगाऊ पाणी देण्याची शक्यता आहे, याची नोंद घ्यावी. तसेच, चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी बियाणे आणि खतांची योग्य मात्रा वाढवावी, असा महत्त्वाचा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास हरभऱ्याचे उत्पादन १० ते १२ क्विंटल प्रति एकर पर्यंत येऊ शकते.
















